Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

 पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.वृद्धापकाळाने त...


 पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार म्हणून लोकप्रिय होते. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले.पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे. 

द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत. द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाई प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झाले आहेत.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी वठवली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

१९९८ साली परळु वैजनाथ येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते.

पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी 'भुताची गोष्ट' ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता ८३ व्या वर्षीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

'एक डाव भुताचा' आणि 'ठकास महाठक' ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता.