करकंब : जळोली चौकातून धाकटी वेस मार्गे गावात येताना ओढ्यावरील पुल सातत्याने पाण्याखाली जात होता. पुलाच्या दोन्ही बाजूला बंधारे आहेत. त्यामध्...
करकंब : जळोली चौकातून धाकटी वेस मार्गे गावात येताना ओढ्यावरील पुल सातत्याने पाण्याखाली जात होता. पुलाच्या दोन्ही बाजूला बंधारे आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठते. एका अर्थाने गावातील आड, विंधन विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदतच होत असते. परंतु ओढ्यावरील दक्षिणेकडील बंधाऱ्याची उंची जास्त झाल्याने सदर पुलावर पावसाळ्यात पाणी साठून राहते. त्यामुळे गावात येण्यासाठी जवळचा मार्ग नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. त्यातच शाळा सुरू झाल्याने महामार्गाचा वापर करणे विद्यार्थ्यांसाठी अधिक धोकादायक असल्याने आहे धोका पत्करून विद्यार्थी दगडात पेक्षा वीट मऊ या हेतूने याच पुलावरून विद्यार्थी ही येत-जात होते.
हा पुल PWD कडे आहे. राष्ट्रवादीने २ महिन्यांपूर्वी करकंब येथील PWD कार्यालयाला निवेदन दिले होते. परंतु यावर कोणतीही उपाययोजना, कार्यवाही या खात्याने केली नाही.
तात्पुरते ह्या समस्येचे निवारण व्हावे यासाठी ग्रामपंचायतने लक्ष घालावे अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या.
याची दखल घेत ग्रामपंचायतने सिमेंट पाईप टाकून त्यावर मुरूम टाकून पुलाची उंची वाढवली आहे. नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, योग्य उंचीचा पुल व्हावा यासाठी करकंब ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावू.
तसेच गत दोन वर्षांत करवसुली अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत चे उत्पन्न फारच कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक मूलभूत समस्या सोडवताना अडचणी येत आहेत. त्यातूनही प्राधान्याने ह्या समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. अनेक समस्यांचे निवारण सातत्याने करत आलो आहोत. याबाबत नागरिकांनी कोणतेही गैरसमज न करून घेता. ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपला ग्रामपंचायत कर भरून आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी आपणही सहकार्य करावे.
आदिनाथ देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत करकंब